प प्रतिनिधी
मुंबई
‘करोना’चा फैलाव वाढत असल्यानं व महाराष्ट्रात पहिला बळी गेल्याचं समोर आल्यानं चिंता वाढली आहे. ‘करोना’चा सामना करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘काही दिवस मुंबई नियोजनपूर्वक बंद केली तर...? कदाचित संकट टळेल,’ असं मत पंकजांनी मांडलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंकजांनी ‘करोना’च्या फैलावाबद्दल चिंता व्यक्त करतानाच काही उपायही सुचवले आहेत. ‘व्यवस्थित नियोजन करून मुंबई बंद केली तर कदाचित करोनाच्या संकटाचा सामना करता येऊ शकतो. आधीच कल्पना दिल्यास लोक आवश्यक त्या गोष्टींचा साठा घरी करून ठेवू शकतील. मुंबईतील लोकल ट्रेन सात दिवस बंद राहिल्या तर लाखो लोकांना ‘करोना’च्या विषाणूपासून दूर ठेवता येऊ शकते. दुकानं केवळ अति महत्त्वाच्या खरेदीसाठी उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. कुठल्याही प्रकारच्या विंडो शॉपिंगला परवानगी देऊ नये. असा काही प्रयत्न करून पाहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं पंकजांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत.
मुंबईच बंद केली तर... पंकजा मुंडेंनी सुचवला उपाय